Tuesday, January 02, 2007

नमस्कार,गेल्या आठवड्यात एका दिवाळी अंकात (मनशक्ती) खालील लेख वाचला, तो मला स्वत:ला खूपच आवडला, आपणा सर्वांबरोबर तो share करावा असे वाटले(स्वामी विज्ञ्नानानंद् यांनी १८/११/९३ रोजी प्रकाश समाधी घेतली, त्या आधी मनशक्तीच्या ९३ च्या अंकातील अखेरचे निरोप यात्रेतील हितगूज ) विज्ञ्यानंद्मुला ! मी गेल्यावर तू कसा वागशील?मुला ! मी गेल्यावर तू कसा वागशील?फार रडू नको, फार हसू नको.तू हसण्याची शंका, अहंकाराच्या अस्मितेपुरतीच. कारण, पुष्कळ्वेळा, माणूस म्हणतॊ " मी जगाला रडलेला दिसणे हे दुबळेपणाचे लक्षण आहे, तसं मी करणार नाही एकवेळ. माझ्याबद्दल गैरसमज झाला तरी चालेल; पण मी आनंदी दिसेन. मी एका श्रेष्ठ आईचा मुलगा आहे, मी एखाद्या गरीबासारखा राहणार नाही. " असा विचार करण्याचा अहंकार तू बाळगू नकोस.मृत्यू हा एक कसाचा दगड असतो. तेथे श्रेष्ठत्वाचे सोने सिध्द होतं. पण सोनं म्हणजे काही विकायला काढलेलं सोनं नव्हे. माणसाच्या हृदयातलं सोनं. ते आपल्या धातूपणाचे आकार आणि स्वीकार बदलत राहतं. कधी कठोर जलशून्य राहणं, सुवर्ण समता मनाच्या स्थंडीलावर विराजमान ठेवणं हेच सुवर्ण लक्षण असतं.मी गेल्यावर तुला दु:ख होईल. त्यात तू बुडून जाऊ नकोस. दु:खाचे दैन्य दाखवू नकोस. तसाच आनंदाचा भारही तुझ्या स्पंदनाने साकारू नकोस. मृत्यू हा अटळ असा देहाचा शेवट असतो. पण प्रत्येक शेवट ही कशाची तरी सुरुवात असते. स्वर्गाची म्हण, नरकाची म्हण. किंवा दोन्ही पलिकडल्या सम शांत मोक्षाची म्हण. म्हणून स्मशान म्हणजे सम शांत राखण्याची जागा असते.इथली सगळी कर्तव्य करून झाल्यावर, जे काही असेल ते ज्याचं त्यानंच भोगायचं असतं. उरलेल्यानं आपला डाव पुरा करायचा असतो. मध्ये खेळ सोडायचा नसतो. तू मध्ये डाव सोडलास तर ना तुझी प्रतिष्ठा ना मला सुख; ना तुला घडविण्यासाठी मी जो काही जीव पाखडला असेल, त्याची इती कर्तव्यता.म्हणून माझ्या दु:खाने एका बाजुने लाचार होऊ नकोस तसा लुच्चाही दिसू नकोस. या पुढे प्राप्त कर्तव्य अधिक जबाबदारीने करण्याचा क्षण सुरू झाला आहे, हे लक्षात घे. यापुढे तुला स्वत:ला मुलगा म्हणून जगायचं आहे. मी तुझ्यातच जगणार आहे. माझे काही दोष मी तुझ्या हवाली केले असतील सुद्धा पण जाणीवपूर्वक काही केले असेल तर, माझ्यातील गुण तुझ्यात ठेवण्याची धडपड. ते तू जपणं, म्हणजे मलाच तुझ्यावर जगवणं नाही का? तुझ्या पुरतं तेच खरं आहे. आपण हेतूची बीज ठायी ठायी ठेवून जात असतो. संबंध असलेल्या सगळ्यानाच आपल्या दोषांचा बोजा आपण देत असतो. तसा गुणांचा बीजांकूरही देतो. किंवा मुलगा तो जास्त प्रमाणात घेतो, एवढंच. ते साहजीकच आहे. कारण तेथे मूळ बीजाचा अलंकार समगतीत स्पंदित असतो.मुला मी गेल्यावर एकटा कधी तू बसू नकोस, शक्य तेव्हढा वेळ तू समुदायात राहा. आपण ठरवलेल्या एखाद्या चांगल्या कामात तू गुंतून जा. म्हणजे वाजवीपेक्षा जास्त दु:ख उसळणार नाही. आणि मला विसरण्याचा आरोपही कोणाला करता येणार नाही...तसे तर आरोप होतच असतात. आपल्या माणसासाठी रडलं तर लोक दुबळा म्हणतात. हसलं तर लोक कोडगा म्हणतात. म्हणून शेफारणं नको आणि शहारणंही नको. असा वाग....आपल्या डोळ्यात पाणी दिसलं नाही तर हा प्रश्न तू रद्द करून टाक. रडण्याच्या मापावर माणसाची उंची आणि खोली ठरू नये.पण प्रत्येक आयुष्य उंची वाढवणारं असतं. तसं रुंदी वाढवणारं असावं. काळाचा उभा धागा संपर्कात आलेल्या माणसाच्या आडव्या धाग्याने, गोडी गुणाकाराने विणला, तर यशस्वी आयुष्याचं एक शानदार वस्त्र तयार होतं. शेजारचा एखादा कच्चा धागा, आयुष्याची वीण कच्ची ठेवतो. वस्त्र एक दिसलं तरी, मध्ये मध्ये एक सूक्ष्म पोकळी असतेच. तेव्हा पलिकडला माणूस तुझ्याशी पूर्णपणे समरस होणं शक्यच नसतं. तुझ्या शेजारी चिकटून उभा राहिलेला माणूस मध्ये काही फट ठेवूनच उभा असतो. शरीर भेद आणि मतभेद हे देह-मनाचे सहगुण आहेत. वाढत्या शरीराबरोबर मतभेदांचं क्षेत्रं कमी करत जाणं याचंच नाव शहाणपणाचं आयुष्य....तुझ्या सहकार्यांशी जमवून घे. मतभेदाला वाव ठेव.पण मनभेदातला वाव कमी कर. स्वत:च्या कष्टाचं राख; दुसऱ्याच्या कष्टाचं मागू नकोस. बिन कष्टाचं आज तुला मिळेल सुद्धा पण अखेर ते तुला दु:खाच्या त्रासासकट फेडावं लगेल.वरिष्ठांशी नम्रतेने पण स्वाभिमानाने वाग, अखेर तू कुणाला भिशील तर, ज्याला भिशील त्याचंही नुकसानच करशील. त्याचा अहंकार पोसण्याचं साधन तू कशाला बनावस? जिथे तुला लाचार बनविण्याचा प्रयत्न होईल, तिथून तू हळू हळू पण निश्चयाने दूर जा. स्वत:च्या क्षेत्रात जमवून, मिळून मिसळून घे. चूक झाली असेल तर चटकन कबूल करून आणि चूक झाली नसेल तेव्हा आपली बाजू मोकळी करत पुढे जा. गैरसमजाच्या जाळ्यात आयुष्य जळू देऊ नकोस.प्रत्येक आयुष्याला आपापलं आभाळ उभारायचं असतं. तुझ्या आयुष्याचं जाळं अभ्यासाने भरलेलं असो. तुझ्या आसऱ्याच्या भिंती, कर्तव्याच्या कसोटीने उभारलेल्या असोत. अभ्यासाची शांति आणि देहकर्तव्यपूर्ततेसाठी शक्ती; या दोन पायांवर तू चालत राहा.मी इथून पुढे कुठे जाणार आहे, काय करणार आहे, हे माझं मलाही एक रहस्य आहे. माझा बेत मी केला आहे खरा; तो अखेर नियतीच्या सगळ्या नियमांशी जुळला पाहिजे. नियतीच्या अज्ञातातून मला दिसलेली दृश्यं खरी किती आणि खोटी किती हे उद्याच्या उदयातूनच मला समजणार आहे. पण ते मी तुला कळवू शकणार नाही! आणि ते तुला कळण्याची गरजच काय? शब्दाने मला सांगता आलं नाही तरी, शहारे आणि शांति या टोकातून सांगता येईलच. तू जरी वर वरची उत्सुकता दाखवली नाहीस तरी एखाद्या प्रशांत क्षणाला, तुलाही सत्याचा आंतर संदेश मिळून जाईल.मिळेल का नाही याची शंका तू का घेतोस? ज्या नियतीने आपल्याला एकत्र आणलं ती नियती स्वत:चच ते एकत्र आणणं, छेदून कसं आणि कशाला टाकील? तू फक्त ऐकण्याचे कान, पाहाण्याचे डोळे अधिक सूक्ष्म कर! यथाकाळ तुला योग्य ते दिसेल, ऐकू येईल. किती काळात येईल? हे मी काय सांगणार? काळातीत अवस्थेत, काळाचा हिशोब कसा करणार? तू एकच कर. अपरिहार्य अश्रू तुझ्या डोळ्यात येतीलसुद्धा; पण त्यात तू गुंतून जाऊ नकोस. अश्रूंचं धुकं सत्य पाहण्याचं सामर्थ्य कमी करतं.ऊठ तुला ज्ञानाच्या ओंजळीने द्यायचं ते दिलं. कधी त्यात कठोरतेचे किल्मिष भासलं असेल कधी पराकोटीचा पान्हा असेल. दोन्हीच्या मर्यादा ओलांडून, आकाशाच्या उंबऱ्यापलिकडे मी जातो आहे. तू ॐकार हो, ॐकार हो ॐकार हो!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home